थांबवलस का ?
निरंतर सुरू असलेल्या एकाकी वादळाला
चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन रोकलस का ?
त्या अगणित खिडक्या
सगळ्या बंद केल्यास का ?
दिसतोय का कुठून उन्हाचा एकच किरण
म्हणून सारं काही झाकल का ?
डोळ्यावर झापड लाव ,
प्रकाशाच्या त्रासाने डोळे ओलावतील
आयुष्याची सारी जमापुंजी वाहून नेतील
म्हणून काळ्या गर्द रंगाचे पडदे लावलेस का ?
हे सगळं नाही केलस का अजून ?
म्हणजे जीव अजून बाकी आहे
फक्त श्वास सुरू नाही तर
थोडी आस बाकी आहे
गुलाबाच्या बागेत काट्यासाकट चालताना
रक्ताळलेल्या पायाकडे फक्त बघायचं
शास्त्र समजून , आणि
जिवंतपणाची अनुभूती घ्यायची !!